शुक्रवारी 278 उपवरवधुंचा गृहस्थाश्रमात प्रवेश चंद्रपुरात विदर्भस्तरीय सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा.

151

दि. 17 मे 22 ( सुनील तायडे )

शुक्रवारी 278 उपवरवधुंचा गृहस्थाश्रमात प्रवेश

  • चंद्रपुरात विदर्भस्तरीय सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्री वेंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट, चंद्रपूर; श्री गौरवबाबु पुगलिया वर-वधू सूचक केंद्र, चंद्रपूर,बी.पी.एम. मजदूर ट्रस्ट, बल्लारपूर व आस्था बहुउद्देशिय चॅरीटेबल ट्रस्ट, वरोरा च्या संयुक्तवतीने विदर्भस्तरीय सर्वधर्मीय भव्य सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन श्री बालाजी ‘गोल्डन टेम्पल’परिसरात ,शुक्रवार, दि. 20 मे 2022ला सायं.7 वाजता करण्यात आलेले आहे.या सोहळ्यात विविध धर्मातील एकूण 278 उपवरवधू गृहस्थाश्रमात प्रवेश करणार असल्याने महानगरात हा विषय चर्चेचा ठरला आहे.

*विविध आनंददायी कार्यक्रमांचे आयोजन*
आझादी का अमृत महोत्सवच्या पार्श्वभूमीवर यावेळी बुधवार 18 मे ला सायं. 6ते रात्री 10 पर्यंत
सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, (मुंबई) यांच्या विविधांगी सुश्राव्य गायनाच्या बहारदार कार्यक्रमाचे श्री बालाजी मंदीर देवस्थान परिसरातील तिरुपती बालाजी नगरीचे भव्य प्रांगण, दाताळा रोड, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.तर गुरुवार 19 मे ला याच स्थळी सायं. 6 ते रात्री 10 पर्यंत उस्ताद मुनाव्वर मासूम व कव्वाल रुबी ताज, मुंबई यांचे कव्वाली गायन होणार आहे.
शुक्रवार 20 मे रात्री 8 वाजेपासून छप्पन भोग (विविध प्रकारचे मिष्ठान्न)भोजन देखील ठेवण्यात आले आहे. सन 2000-2001 मध्ये गणेशोत्सव प्रित्यर्थ आयोजित केलेल्या ‘छप्पन भोग’ स्वरुची आनंददायी भोजनाची आठवण व्हावी म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य हा कार्यक्रम आयोजित आहे.
शनिवार 21मे ला’यात्रेकरी भोजन’कार्यक्रम महाकाली मंदीर येथे असून’ मातोश्री वृद्धाश्रम वृद्धांसाठी भोजन तर दि. 23 मे ला सकाळी 6वाजता पुरुष व महिला गटासाठी वेगवेगळी मॅरॉथॉन स्पर्धा गांधी चौक येथे आयोजित करण्यात आली आहे.अशी माहीती या सर्व सोहळ्याचे मुख्य आयोजक कामगार नेते,माजी खासदार नरेश पुगलिया यांनी डेली पोस्टमार्टम शी बोलतांना दिली आहे.

*3 एकरात उभी होत आहे व्यवस्था*

20 मे ला सायंकाळी पार पडणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू धर्मातील 162,बौद्ध धर्मातील 98,ख्रिश्चन धर्मातील 6 तर मुस्लिम धर्मातील 2 अन्य 10 असे एकूण 278 जोडपे विवाह बद्ध होतील.यासाठी 3 एकर परिसरात भव्य व्यवस्था उभारण्यात आली आहे.3000 चाकी व 400 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे.नवं वरवधूंनी दुपारी 3 पर्यंत पोहोचावे असे आवाहनही नरेश पुगलिया यांनी केले आहे.