Home Breaking News अहेरी विभागात माहिती अधिकाराचा गैरवापर; तथाकथित कार्यकर्ते व पत्रकार माध्यमातून करतात वसुली:...

अहेरी विभागात माहिती अधिकाराचा गैरवापर; तथाकथित कार्यकर्ते व पत्रकार माध्यमातून करतात वसुली: प्रशासनाचा वचक नसल्याने हिम्मत वाढली.

105

अहेरी विभागात माहिती अधिकाराचा गैरवापर? काही तथाकथित कार्यकर्ते व पत्रकार ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून करतात वसुली;

  1. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज, प्रशासनाचा वचक नसल्याने, हिंमत वाढली.

अहेरी :– अहेरी तालुक्यात काही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आणि माहितीच्या अधिकाराचा (RTI) वापर करणाऱ्या व्यक्तींनी शासकीय अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देण्याचे, चुकीच्या पद्धतीने दबाव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. प्राप्त माहितीनुसार, हे लोक वारंवार शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकाराचे अर्ज दाखल करून, त्यातून मिळालेल्या माहितीचा वापर अधिकाऱ्यांना बदनाम करणे किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी करत आहेत.

या प्रकारामुळे तालुक्यातील अनेक प्रामाणिक अधिकारी आता संभ्रमित स्थितीत काम करत असून, कार्यक्षमता आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होत आहे. काही अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, “या व्यक्तींचा हेतू पारदर्शकता नव्हे, तर व्यक्तिगतरित्या पैसे वसूल करणे आहे. काही प्रकरणांमध्ये धमकी, व्हिडिओ रेकॉर्डिंग, व बदनामीचे हत्यार म्हणून मीडिया किंवा फेसबुक यांसारख्या माध्यमांचा वापर होत आहे.”

अशा प्रकारांनी प्रशासनाच्या कामकाजावर व जनतेच्या अपेक्षांवर विपरीत परिणाम होत असल्याने, गडचिरोली जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि अशा प्रकरणांची चौकशी करून खोट्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरी वर्तुळातून जोर धरू लागली आहे.

तसेच, या लोकांचा आर्थिक स्रोत काय आहे? हे पत्रकार किंवा कार्यकर्ते स्वतःचे उपजीविकेचे साधन काय म्हणून दाखवतात? याचाही तपास आवश्यक असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने या पद्धतीने सुरु असलेल्या “ब्लॅकमेलिंग इंडस्ट्री” वर नजर ठेवावी, खरे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बदनाम होणार नाहीत याची काळजी घ्यावी, हीच आता वेळेची गरज आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.