सुरजागड प्रकल्प वाढी संदर्भात झालेल्या जन सुनावणीत वनिता कोरामी यांच्याकडून महत्त्वपूर्ण मागण्या

138

गडचिरोली: 28 जानेवारी 2025 रोजी गडचिरोली जिल्हा नियोजन भवन मध्ये सुरजागड प्रकल्पाच्या वाढी संदर्भात झालेल्या जन सुनावणीत तोडसा ग्रामपंचायतच्या सरपंच, वनिता कोरामी यांनी आपल्या विचारांची मांडणी केली. त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी आणि पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या सरकार आणि पर्यावरण विभागाकडे ठेवल्या.

वनिता कोरामी यांनी आपल्या विचारात म्हटले, “बांडे ते पेठा नदीवर पूल पावसाळ्यात चार महिने बंद असतो, यामुळे रहदारी पूर्णपणे थांबते.नविम पूलाची निर्मिती तातडीने करावी .” त्याचप्रमाणे, त्यांनी सुरजागड खदानीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर देखील चिंता व्यक्त केली आणि त्यासाठी कंपनी प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रत्येक”ग्रामपंचायत मध्ये एक ॲम्बुलन्स उपलब्ध करावी आणि प्रत्येक गावात एक परिचारिका द्यावी,” असे त्यांनी सांगितले.

कोरामी यांनी हेडरीतील दवाखान्याची संख्या वाढवण्याची मागणी केली आणि त्याचा दर्जा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलसारखा करण्यात यावा, जेणेकरून रुग्णांना सर्व सुविधा मिळू शकतील. “गावातील सर्व स्थानिक युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार कंपनीमध्ये नोकरी मिळावी,” अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, सरपंच वनिता कोरामी यांनी स्पष्ट केले की, “आम्हाला प्रकल्पाला विरोध नाही. प्रकल्पामुळे परिसरातील हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे, महिलांनाही रोजगार मिळाला आहे. तरीही, रोजगार निर्मितीसाठी आणखी कशा प्रकारे उपाययोजना केल्या जाऊ शकतात, याकडे कंपनी प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाने विशेष लक्ष द्यावे.”

जन सुनावणीत गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा, पर्यावरण विभागाचे अधिकारी, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किसान, आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, माजी आमदार डॉ देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार आणि परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, भुमिया गायता व अन्य जनसमुदाय उपस्थित होता.

सर्वांनी एकत्र येऊन सुरजागड प्रकल्पाच्या वाढीसंबंधी विचार मांडले आणि पुढील कार्यवाहीसाठी शासन आणि कंपनी प्रशासनास मार्गदर्शन केले. जन सुनावणीने एक सकारात्मक आणि विकासाच्या दृष्टीकोनातून विचार व्यक्त केले, जेणेकरून गडचिरोली जिल्ह्यातील परिसराचा समृद्ध आणि समग्र विकास होईल.