गडचिरोली: बांडे गावातील रहिवासी रामजी गुंडरू यांनी सुरजागड प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी झालेल्या जन सुनावणीमध्ये आपल्या विचारांची मांडणी केली. त्यांनी गावाच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या, ज्या परिसरातील नागरिकांच्या भल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात.
रामजी गुंडरू म्हणाले, “लाईट कंपनीने जी शाळा बनवली आहे, ती केवळ वर्ग एक ते पाच पर्यंत आहे. त्याची वाढ करून बारावीपर्यंत शाळा व्हावी. हेडरी गावामधील दवाखान्याची बेड संख्या सध्या ३० आहे, पण त्याची वाढ करून बेड संख्या १०० केली जावी आणि सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध व्हावेत. चांगले डॉक्टर्स, अत्याधुनिक मशीन्स, एम आर आय आणि सोनोग्राफी सारख्या सुविधांनी सुसज्ज असलेले हॉस्पिटल असावे.”
तसेच, त्यांनी गावातील प्रत्येक युवक आणि महिलांना रोजगार मिळावा, परिसरात सिमेंट रस्ते, नाल्या आणि गावाचे सुशोभीकरण करावे, असे सांगितले. “बिरसा मुंडा, भगवान आणि शहीद वीर बाबुराव शेडमाके यांसारख्या थोर हुतात्म्यांची मूर्ती स्थापन करण्यात यावी. समाज भवन तयार करावा, मुलांना खेळण्यासाठी मोठा पटांगण तयार करावा,” असेही रामजी गुंडरू यांनी म्हटले.
शेवटी, रामजी गुंडरू यांनी सुरजागड प्रकल्पाच्या वाढीव प्रकल्पाला आपला पूर्ण पाठिंबा दिला आणि शासन व कंपनीने त्यांच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
जनसूनवणीला जिल्हाधिकारी अविशांत पंडा खा.डॉ. नामदेव किरसान,आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम,आमदार डॉ मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम व परिसरातील सरपंच,पोलीस पाटील,गाव पाटील,ग्रामपंचायत सदस्य, बहुसंख्य जणसमुदाय उपस्थित होते.